'बंजारा'च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण

'बंजारा'च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण

'बंजारा'च्या २० फूट भव्य पोस्टरचे महेश मांजरेकर यांच्या हस्ते अनावरण

_शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे येणार पहिल्यांदाच एकत्र

_ स्नेह पोंक्षेचे दिग्दर्शनात पदार्पण

*  सिने प्रतिनिधी

    मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करत असलेल्या 'बंजारा' या चित्रपटाचा शानदार पोस्टर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटाच्या २० फूट उंचीच्या भव्य पोस्टरचे अनावरण करण्यात आले. सोहळ्यात विशेष लक्षवेधी ठरली ती शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे आणि स्नेह पोंक्षे यांची बाईकवरील ग्रँड एन्ट्री. या कार्यमक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महेश मांजरेकर उपस्थित होते. स्नेह पोंक्षे लिखित, दिग्दर्शित 'बंजारा' या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्रीचा प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. 'बंजारा' चित्रपट येत्या नाताळमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

नुकत्याच झळकलेल्या पोस्टरमध्ये तीन वयस्क मित्र सिक्कीमच्या पर्वतरांगांमध्ये बाईकराईडचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी किती आनंददायी आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावरून व्यक्त होत आहे. अनेकदा कुठे जायचंय, यापेक्षा तिथपर्यंत पोहोचण्याचा अनुभव सुखकारी असावा, ही गोष्ट प्रवासात नेहमीच महत्वाची असते आणि आपण याच आनंदाला बऱ्याचदा मुकतो. याचे महत्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शरद पोंक्षे निर्मितीत आणि स्नेह पोंक्षे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. 

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, “हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनाची कथा सांगणारा आहे. स्नेहने हा विषय खूपच सुंदर हाताळला आहे. तीन मित्रांच्या प्रवासाची ही कथा प्रेक्षकांचे मतपरिवर्तन करणारी आहे. पोस्टरवरून प्रेक्षकांना साधारण कथेचा अंदाज आला असेलच. मला खात्री आहे, चित्रपटही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'' 

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, “माझ्या पहिल्या चित्रपटात वडिलांसोबत, भरत जाधव, सुनिल बर्वे अश्या दिग्गच कलाकारनसोबत काम करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा मला या चित्रपटासाठी निश्चितच फायदा झाला आहे.  ‘बंजारा’ चित्रपटाच्या संकल्पनेतून मला एक गोष्ट सांगायची होती - असं म्हणतात की कुठे जायचंय त्यापेक्षा तिथे जाण्या चा प्रवास आनंददाई असायला हवा पण आपण तो आनंद कधी लुटतच नाही बंजऱ्या सारखं जमलं पाहिजे आनंदाने प्रवास करता आला पाहिजे, फिल्म मधला प्रवास ही प्रेक्षकांना नक्की अवडेल याची खात्री आहे मला.